टेम्पोला आग लावून मृतदेह जाळला खून लपवण्यासाठी लढवली शक्कल. पोलिसांनी शातिर खुन्याला साथीदारांसह शिताफीने पकडले
मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर रसायनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत पुणे कडील लेनवर 12 ऑक्टोबरच्या 2021क्या मध्यरात्री एक मालवाहू टेम्पोला आग लागून त्यात एकाचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली होती.
या घटनेच्या तपासाअंती भयानक सत्य बाहेर आले असून तो व्यक्ती टेम्पोच्या आगीत जळाला नव्हता तर त्याला क्रूरपणे जाळण्यात आल्याचे समोर आले आहे.
अतिशय योजनाबद्धरित्या एखाद्या सिनेमात शोभवी अशी शक्कल या गुन्ह्यात गुन्हेगारांनी वापरली होती. मात्र रसायनीचा पोलिस यंत्रणेने सुतावरून स्वर्ग गाठत जळीतकांडाचा यशस्वी तपास करून खून करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत मात्र यातील अजुन एक जण फरार असुन त्याचा शोध घेतला जातोय. सदर खून हा अनैतिक संबंधाच्या संशयावरून झाला असल्याचे समजते.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार मंगळवारी रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर मध्यरात्रीच्या सुमारास रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका टेम्पोला आग लागली होती. आगीची माहीत मिळताच पोलिसांसह आय आर बी ची पेट्रोलिंग टीम, अग्निशमन दल, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठीची टीम तेथे पोहचल्या होत्या. आग आटोक्यात आणल्या नंतर लक्षात आले की, टेम्पोच्या केबिन मध्ये एका व्यक्तीचा जळून अक्षरशः कोळसा झाला आहे. त्या मृतदेहाची ओळख पटवणे मोठे जिकरीचे काम होते. शेवटी गाडीच्या मालकाचा शोध घेताला असता मयत व्यक्ती हा सदाशिव संभाजी चिकाळे राहणार पुनावळे, ता मुळाशी, जिल्हा पुणे येथील असल्याचे समजले.
अपघाताच्या तपासासाठी रसायनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कैलास डोंगरे यांनी सहा.पोलीस निरीक्षक बालवडकर, पी.एस.आय. काळे, पोलीस नाईक विशाल झावरे, मंगेश लांगे, राहुल भडाळे यांच्या दोन टीम तयार केल्या होत्या. मयताची खबर जेंव्हा त्याच्या घरच्यांना दिली, तेंव्हा त्यांनी सदाशिवचा खून झाला असेल असा संशय व्यक्त केला आणि त्याचे एका व्यक्ती बरोबर भांडण होते अशीही माहिती दिली.
सदाशिवच्या नातेवाईकांनी सांगितलेल्या माहिती नुसार पोलिसांनी आपली तपासाची सूत्रे त्या दिशेने फिरवून शक्यता पडताळून पाहण्याचे ठरवले. त्या रात्री सदाशिव भिवंडी मधून टेम्पोमध्ये माल घेऊन पुण्याकडे निघाला होता हे निष्पन्न झाले. सदर मार्गावरील घटनास्थळापर्यंत सर्व ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, एक संशयित कार त्या टेम्पोचा पाठलाग करीत असल्याचे पोलिसांना निदर्शनास आले. तोच धागापकडून सदाशिवच्या घरच्यांनी ज्याच्यावर संशय व्यक्त केला होता त्यास पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेण्याचे ठरवले मात्र ती व्यक्ती अपघाताची घटना घडल्यानंतर नंतर गायब असल्याचे लक्षात आले. त्याच्या मोबाईल लोकेशन नुसार त्याचा माग काढत त्याला एका साथी दारासह देहू मधून अटक करण्यात आली. सदर हत्याकांडात त्याच्यासह आणखी दोन साथीदार होते असे समजले असून त्यातील एक जण अद्याप फरार आहे.
सदर संशयिताची झाडाझडती घेतली असता त्याला त्याच्या बायकोचे व मयत सदाशिवचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. त्यावरून या दोघांमध्ये भांडणही झाले होते. अशी त्याही पलीकडे जाऊन चौकशी केली असता घटनाक्रम समोर आला तो असा की, सदर इसमाने सदाशिवचा कायमचा काटा काढायचे ठरवले होते त्यासाठि तो सदाशिव वर पाळत ठेऊन होता. मंगळवारी सदाशिव भिवांडीहून पुण्याकडे टेम्पो घेऊन गेला आहे असे त्याला समजताच, त्याने दोन साथीदारांना बरोबर घेऊन कारने सदाशिवचा पाठलाग केला. कळंबोली येथून एक्स्प्रेस वेवर सदाशिवच्या टेम्पोच्या मागे जावून रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आल्यावर त्याने आपली कार आडवी घालीत त्याला टेम्पो बाजूला घ्यायला लावला आणि सदाशिवला बेदम मारहाण करीत बेशुद्ध केले. नंतर टेम्पोला आग लावून ते तिघे तेथून पसार झाले.
त्या आगीत बेशुद्ध सदाशिवचा जळून अक्षरशः कोळसा झाला होता. या भयानक गुन्ह्यात रसायनी पोलिसठाण्यात भादवी 302, 201, 435, 506, 34 कलमा प्रमाणे गुन्हा नोंदवला असून दोघांना अटक केली असून एका फरारी आरोपीच्या शोधात रसायनी पोलीस आहेत.
चोर कितीही हुशार असला तरी तो कोणता ना कोणता पुरावा मागे ठेवतोच. पोलीसांनी केलेल्या या कौतुकासपात्र कामगिरीची सर्वत्र चर्चा आहे.
खालापूर तालुक्याचे विभागीय पोलिस अधिकारी संजय शुक्ला यांचे या प्रकरणी मार्गदर्शन तर खोपोलीचे पोलिस निरिक्षक शिरीष पवार आणि खालापूरचे पोलिस निरीक्षक अनिल विभुते यांचे सहकार्य लाभले.
Comments
Post a Comment